15 दिवसानंतर सुद्धा पत्नी वंदना मेश्राम व मुलगा स्वप्नील मेश्राम यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरुच
चंद्रपूर प्रतिनिधी :-
तहसील प्रशासन न्याय देतं नाही म्हणून भद्रावती तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या केलेले स्व. परमेश्वर मेश्राम यांच्या कुटुंबाला अद्याप न्याय मिळाला नसल्याचा आरोप करत त्यांच्या पत्नी वंदना मेश्राम आणि मुलगा स्वप्नील मेश्राम यांनी न्यायासाठी २० मे २०२६ पासून ठिय्या आंदोलन सुरु आहे पण तब्बल 14 दिवसाच्या आंदोलनानंतर सुद्धा जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नाही किंव्हा धानोरकर परिवाराचा सदस्य सुद्धा आंदोलन मंडपात फिरकला नाही, दरम्यान जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनाचा या आंदोलनानाला पाठिंबा मिळत असून हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.
स्व. परमेश्वर मेश्राम यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर अजूनपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही, तसेच मेश्राम कुटुंबाची जमीन बळकावल्याचा आरोप असतांना संबंधितांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले नाही, शिवाय नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्यावर सातबारा फेरफार प्रकरणात पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केला असून, तत्कालीन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पीडित कुटुंबातील स्वप्नील मेश्राम यांना शासकीय नोकरी देण्यात यावी, अशीही प्रमुख मागणी वारंवार प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मात्र ज्यासाठी परमेश्वर मेश्राम यांनी आत्महत्त्या केली व आपल्या सुसाईट नोट मध्ये आपण कशासाठी आत्महत्त्या करतोय ते नमूद असतांना त्यावर प्रशासन कुठलीही कारवाई करायला तयार नाही त्यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय कोण देणार हा प्रश्न उपस्थित होतं आहे.
दरम्यान पत्नी वंदना आपल्या मुलाला सोबत घेऊन न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 14 दिवसापासून आंदोलन करतं आहे त्या आंदोलनामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा परमेश्वर मेश्राम आत्महत्या प्रकरण चर्चेत आले असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




